Join us

कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?

नव्या चेहऱ्यांसह संघ बांधणीला पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 12:32 IST

Open in App

भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात होतीये. रोहित शर्मा आणि विराट कोहली या स्टार क्रिकेटर्संनी कसोटीतून निवृत्तीनंतर टीम इंडियाचा कोच गौतम गंभीर चर्चेत आहे. दोघांच्या निवृत्तीमागे त्याचा हात असल्याचेही बोलले जात आहे. कोचिंगमध्ये धाक दाखवत आपली हुकमत प्रस्थापित करण्याच्या नादात ग्रेग चॅपल यांनी आपली नोकरी गमावल्याचा इतिहास भारतीय क्रिकेटला आहे. परदेशी प्रशिक्षकच नाही तर अनिल कुंबळे सारख्या दिग्गजानेही टीम इंडियातील 'स्टार कल्चर'मुळे प्रशिक्षक पद सोडत संघापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. पण गंभीर यापेक्षा वेगळा आणि प्रभावी ठरताना दिसतोय. हे देखील ही चर्चा रंगण्यामागचे कारण असू शकते. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

कसोटीत गंभीर पर्वाची सुरुवात

आतापर्यंत भारतीय क्रिकेटमध्ये  कर्णधारासह स्टार क्रिकेटरसमोर कोच फिका ठरल्याचे दिसून आले आहे. पण आता टीम इंडियाच्या नव्या बांधणीच्या इराद्याने गौतम गंभीर आपले वर्चस्व प्रस्थापित करत नव्या पर्वाची सुरुवात करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळेच रोहित शर्मापाठोपाठविराट कोहलीनं घेतलेल्या निवृत्तीमागे कोच गौतम गंभीर असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगताना दिसते. यात तथ्य किती? त्यावर भाष्य करणे कठीण आहे. पण इथं आपण ही चर्चा रंगण्यामागची कारणं समजून घेण्याचा प्रयत्न करूयात.

विराट कोहली पाकिस्तान विरुद्ध एकही कसोटी सामना नाही खेळला, कारण...

गंभीरचा 'स्टार कल्चर' संपवण्याचा खंबीर मानस

बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाले प्रसिद्ध  झालेल्या काही वृत्तांनुसार, टीम इंडियातील 'स्टार कल्चर' संपवण्याचा विडा उचलूनच गौतम गंभीर याने प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली होती. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या नव्या हंगामात नव्या चेहऱ्यांसह टीम बांधणी करण्याचे त्याने स्पष्ट केले होते. वरिष्ठ खेळाडूंच्या भविष्यासंदर्भात गंभीर कशा प्रकारे विचार करतो, याची संघ व्यवस्थापनासह बीसीसीय निवड समितीचा अध्यक्ष अजित आगरकरलाही कल्पना होती. गंभीरनंही अनेकदा स्टार कल्चरसंदर्भात रोखठोक मत मांडत वरिष्ठांना सावध केल्याचेही पाहायला मिळाले होते. कसोटी खेळायची त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळलेच पाहिजे ही सक्ती वरिष्ठ खेळाडूंवरील दबाव वाढवणारी होती. 

नव्या चेहऱ्यांसह संघ बांधणीला पसंती

घरच्या मैदानात न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील लाजिरवणा पराभव आणि त्यापाठोपाठ बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत पदरी पडलेल्या निराशेमुळे भारतीय संघाचे सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा खेळण्याचे स्वप्न भंगले. या गोष्टींची पुनरावृत्ती टाळण्यासाठी गंभीरनं काही खंबीर भूमिका घेतल्याचे दिसून येते. त्यात शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली नव्या टीम बांधणीसंदर्भातील निर्णयाचाही समावेश आहे. शुबमन गिल हा स्टार खेळाडू आहे, पण तो गंभीरच्या निर्णयावर किंवा रणनितींवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करू शकत नाही.  

कसोटीत गंभीर पर्व, पण वनडेत अजूनही 'रोको'

रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीनं कसोटीतून निवृत्त घेण्यामागे थेट गौतम गंभीरचा हात असल्याचा कोणताही पुरावा नाही. पण गंभीरची रणनिती, त्याने नव्या संघ बांधणीसाठी दिलेला जोर या गोष्टीमुळे तो अप्रत्यक्षरित्या दोन दिग्गजांच्या निवृत्तीमागचे कारण असावा, अशी चर्चा रंगू लागलीये. रोहित आणि विराट यांनी कसोटीतून निवृत्ती घेतल्यावर फक्त जसप्रीत बुमराह हा एकमेव खेळाडू आहे जो गंभीरवर भारी पडू शकतो. पण दुखापतीमुळे तोही कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. थोडक्यात कसोटीत आता गंभीर पर्वाची सुरुवात झालीये. वनडेत मात्र गंभीरला 'रोको'सोबतच काम करावे लागणार आहे. रोहित आणि विराट ही जोडी २०२७ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेवर फोकस करत आहे.   

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघविराट कोहलीरोहित शर्मागौतम गंभीर